वर्धा: अश्विन बोदडे
वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने बॅटरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत दोन महिला आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ही कारवाई बजाज चौक परिसरात झालेल्या चोरीच्या संदर्भात करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
शास्त्री चौक, वर्धा येथील रहिवासी रितम नटवरलाल रिंघवे यांच्या मालकीच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी बॅटरी लंपास केल्या होत्या. ही घटना दि. २३ जानेवारीच्या रात्री ते २४ जानेवारीच्या पहाटे दरम्यान बजाज चौक परिसरात घडली होती. या प्रकरणी वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम ३०५(अ), ३३१ (४) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महिला आरोपींच्या मुसक्या आवळल्या
पोलीस तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले:
१. सौ. वंदना किसन जाधव (वय २४ वर्ष)
२. सौ. उषा राजेश कुलरवार (वय ३५ वर्ष)
दोन्ही महिला आर्वी नाका, वर्धा येथील रहिवासी आहेत. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
मुद्देमाल जप्त
आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:
- अॅमरॉन कंपनीची १ बॅटरी (किंमत ४,०००/-)
- सोनिक कंपनीची १ बॅटरी (किंमत २,०००/-)
- एनरटेक्स कंपनीची १ बॅटरी (किंमत ४,०००/-)
- पॉवर झोन कंपनीच्या २ बॅटऱ्या (किंमत ६,०००/-) एकूण १६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. सागरकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार संतोष ताले, गुन्हे शोध पथकाचे शरद गायकवाड, प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे, वैभव जाधव, श्रावण पवार आणि मनीषा साखरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत वंजारी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या