सचिन हाडके
जिल्हा प्रतिनिधी
वर्धा (येळाकेळी): समृद्धी महामार्गावर झोपेची डुलकी काळ ठरली असून, कारने कंटेनरला मागून दिलेल्या भीषण धडकेत माय-लेकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (१ फेब्रुवारी) सकाळी ६:२० च्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील येळाकेळी जाम केंद्रांतर्गत चॅनेज क्रमांक ३९/९०० वर नागपूर कॉरिडॉरमध्ये घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेकानंद हनुमंत कणबर्गी (वय ५६ वर्ष) हे आपल्या आई आशालता हनुमंत कणबर्गी (वय ८४ वर्ष, दोन्ही रा. रामनगर, नागपूर) यांच्यासह ठाणे येथून नागपूरच्या दिशेने कारने (क्रमांक MH-05-AX-7612) येत होते. पहाटेच्या सुमारास कार चालवताना विवेकानंद यांना झोपेची डुलकी लागल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. यावेळी मिडल लेनवर समोरून जाणाऱ्या कंटेनरला (क्रमांक MH-46-CL-1556) कारने मागून जोरदार धडक दिली.
जागीच मृत्यू व मदतकार्य
ही धडक इतकी भीषण होती की, कारमधील आशालता कणबर्गी यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक विवेकानंद कणबर्गी हे गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे, प्रकाश चौधरी आणि त्यांच्या पथकाने (HC/१३९८, १४१८, PC/१०७९, MSF व QRV स्टाफ) १० मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली.
जखमी विवेकानंद यांना रुग्णवाहिकेच्या साहाय्याने तातडीने सावंगी येथील रुग्णालयात हलवण्यात येत होते, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
वाहतूक सुरळीत
अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. सध्या या मार्गावरील वाहतूक शांततेत सुरू आहे. या घटनेची माहिती सेलू पोलीस स्टेशनला देण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या